भाईंदर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सगनाई नाक्याजवळ ट्रकचालकांनी आंदोलन केल्यामुळे संपूर्ण महामार्ग वाहतूक कोंडीच्या जाळ्यात अडकला आहे. या आंदोलनात पहिल्यांदाच रिक्षाचालकांनीदेखील सहभाग घेतल्याचे दिसून आले. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आंदोलनकारी पसार झाले.
‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणातील शिक्षेच्या कायदेशीर तरतुदींमध्ये बदल करण्यास महाराष्ट्रातील ट्रकचालकांनी तीव्र विरोध केला आहे. या तरतुदींविरोधात मागील काही दिवसांपासून राज्यभर ट्रकचालकांकडून आंदोलन केले जात आहे. मात्र यावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही.
दरम्यान बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सगनई नाक्यावरील मुख्य रस्त्यावर ट्रकचालकांनी गाड्या उभ्या करून आंदोलन केले. यावेळी रिक्षा आणि ओला-उबेर चालकांनीदेखील सहभाग घेतला होता. त्यामुळे वसईच्या दिशेने जाणा-या मार्गांवर वाहनाची रांग लागली होती. यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलनकारी पसार झाले. मात्र रस्त्यावरील वाहने बाजूला करण्याच्या कामात तासाभराचा कालावधी वाया गेला.

