नागपूर : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराला त्याचबरोबर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत एकत्रित असलेले मित्रपक्ष या निवडणुकांमध्ये प्रचार सभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र, अशातच प्रचार सभेत भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना भाजप नेते आशिष देशमुखांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जास्त वळवळ केली तर कापुन काढू, अशी धमकी देशमुखांनी विरोधकांना दिली आहे. आशिष देशमुखांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी त्यांचे व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आशिष देशमुखांचा तो व्हीडीओ शेअर करत टीका केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त वळवळ कराल तर कापून काढू. देशमुखांनी विरोधकांना उद्देशून दिलेल्या या थेट धमकीने एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा?
सदा सर्वकाळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणा-या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करायची परवानगी दिली आहे का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या आमदारांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही आशिष देशमुखांच्या या भाषेला पाठिंबा आहे, असाच त्याचा अर्थ होईल..! असेही पुढे रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बावनकुळेंचीही होती उपस्थिती
आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केले तेव्हा त्या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचा प्रचार करतो का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यावरून कळमेश्वर येथील वातावरण तापले होते.
विरोधकांना जाहीर धमकी देणे चुकीचे
मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापुन काढू हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाहीत तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली ही धमकी आहे. राजकीय विरोध असावा पण विरोधकांना थेट कापून टाकण्याची ही मानसिकता भाजप नेत्यांमध्ये येते कुठून? पाशवी सत्तेच्या बळावर विरोधकांना मारून टाकण्याची भाषा होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे.

