31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयआम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का?

आम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का?

राज ठाकरेंच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. विरोधकांनीही या प्रकरणात उडी घेतली असून राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. यातच शरद पवार यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असून ते बारामतीला जात असल्याचे म्हटले जात आहे. यावरून काही तर्क-वितर्क सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरेतर भाष्य पण करावे असे वाटत नाही. पण तरीही ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावेच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही! असे राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते. यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिले.

राज ठाकरेंचा आमच्याशी संबंध नाही
राज ठाकरे, ते माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का, ते आमच्या पक्षात आहेत का? माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, हे राज ठाकरे किंवा सकाळी नऊ वाजताचे बुलेटिन (संजय राऊत) हे ठरवणार का? आम्ही आमच्या पक्षात काय करावे, हे ते सांगत आहेत. अजित पवार यांच्यानंतर पक्षाचा नवा नेता निवडण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही सध्या विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंर्त्याची निवड केली आहे. आता आमचा पक्ष जरा स्थिरावल्यावर आम्ही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या विषयाकडे लक्ष देऊ असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

उलट-सुलट चर्चा सुरू
आमच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांसंदर्भात विविध प्रकारच्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की दुस-या कुण्या व्यक्तीला निवडणार. आम्ही एक पक्ष आहोत. नेतृत्वाचे दोन भाग आहे. पहिला भाग विधिमंडळ आणि दुसरा भाग राजकीय पक्ष. विधिमंडळाचा भाग संपला. मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी सांगितल्या प्रमाणे, मी अजितदादा आणि शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. अजित दादांच्या निधनानंतर या सर्वप्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी कुणावर राहणार, तर प्रफुल पटेलांवर राहणार. मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याने विधिमंडळ आणि राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रात सुनिल तटकरे यांच्यावर आहे असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR