संगमनेर : प्रतिनिधी
भाजपप्रणीत सरकारच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि अराजकता वाढीस लागल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सोशल मीडियावर चर्चेत असलेली ‘कॉक्रोच पार्टी’ ही सुद्धा जनतेच्या असंतोषाचेच प्रतीक असल्याचे वक्तव्य करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
संगमनेर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि अमृत उद्योग समूहाला भेट दिल्यानंतर सपकाळ बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे आणि शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावान आणि अनुभवी नेतृत्व आहे. त्यांनी विविध जबाबदा-या कार्यक्षमतेने सांभाळल्या असून, त्यांच्या जाणत्या नेतृत्वाची आज राज्याला गरज आहे. एका निवडणुकीवर कोणाचे मूल्यमापन होत नाही. इतिहासात अनेक मोठ्या नेत्यांच्या आयुष्यात चढ-उतार आले, पण त्यानंतरचा टप्पा अधिक मोठा ठरला आहे असे सूचक विधानही त्यांनी केले.
राजकारणात स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कारभाराचे उदाहरण म्हणून थोरात यांचा उल्लेख करत सपकाळ म्हणाले, ‘दूध का दूध और पानी का पानी’ या उक्तीप्रमाणे प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारण करणारे बाळासाहेब थोरात हे विचारांनी आणि आचारांनी समृद्ध नेतृत्व आहे. मोठा जनाधार लाभलेल्या या नेतृत्वाकडून राज्याला अजून अपेक्षा आहेत.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. देशात डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण होत असल्याचा दावा करत त्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. खरीप हंगाम तोंडावर असताना सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
एसआयआर मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत बोलताना थोरात यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर सक्रिय होण्याचे आवाहन केले. ‘बीएलओ-२ची भूमिका निभावत मतदार नोंदणीमधून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश त्यांनी दिले.
















