लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात आज पर्यंत २२५.८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच पाणी टंचाईच्या कृती आराखडयाचा कालावधी दि. ३० जून रोजी संपला आहे. त्यामुळे ३० जून पर्यंत ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणा-या १४ टँकरची चाके दि. १ जुलै रोजी थांबली आहेत. तसेच ४४५ अधिग्रहणही बंद झाली आहेत. ग्रामीण भागात खरीच पाणी टंचाई आहे की ? नाही हे पाहण्याची तसदीही जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. अथवा तशा हालचालीही दिसल्या नाहीत. त्यामुळे लातूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या झळा आवघ्या एका दिवसात संपूष्टात आल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्हयात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी जानेवारीपासूनच ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. फेब्रुवारी महिण्याच्या पहिल्या आठवडयापासून जिल्हयातील ग्रामीण भागात अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मार्च, एप्रिल व मे बरोबरच जून महिण्याच्या अखेर पर्यंत पाणी टंचाईच्या झळा कायम राहिल्या. १८ जून पर्यंत ४४ टँकर व ५८४ अधिग्रहणाद्वारे ग्रामीन भागातील नागरीकांना पाणी पुरवठा केला जात होता. जून महिण्याच्या सुरूवातीपासून जिल्हयात टप्या-टप्याने २२५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जून अखेर पर्यत टँकरची संख्या गेल्या १३ दिवसात ४४ वरून टप्या-टप्याने १४ वर आली होती. तर ५८४ अधिग्रहणांची संख्याही टप्या-टप्याने ४४५ वर आली होती. पाणी टंचाईचा कृती आराखडा ऑक्टोंबर ते जून अखेर असा असल्याने ३० जून रोजी सुरू असलेले टँकर व अधिग्रहणे बंद झाली आहेत.