नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार तिस-या कार्यकाळात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीएकडे संख्याबळ खूप कमी आहे. जराही गडबड झाली तरी सरकार कोसळू शकते असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
राहुल गांधी म्हणाले की, सरकारकडे संख्याबळ इतकं कमी आहे त्यामुळे जरा काही गडबड झाली तरी सरकार पडू शकते. एनडीएतील घटक पक्षांना दुस-या बाजूला जावं लागू शकते. एनडीएतील काही पक्ष आमच्या संपर्कात आहेत. मोदी यांच्या नेतृत्वात ते असमाधानी आहेत असं त्यांनी सांगितले. परंतु एनडीएतील कुठले पक्ष संपर्कात आहेत त्याची नावे राहुल गांधी यांनी सांगितली नाहीत.
तसेच द्वेषपूर्ण राजकारण हे भारतीय जनतेनं नाकारलं आहे. २०१४ आणि २०१९ या कार्यकाळात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी काम केले ते काम आता करू शकत नाही. लोकसभा निकालात इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या, तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे २९३ जागा आहेत. राहुल गांधी भारतीय राजकारणात खूप पुढे गेले. लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी राहुल गांधींना मिळू शकते असं काँग्रेस नेते सांगत आहेत.