30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरगावांचा संपर्क तुटला, पिके पाण्याखाली

गावांचा संपर्क तुटला, पिके पाण्याखाली

जळकोट : ओमकार सोनटक्के 
जळकोट तालुक्यामध्ये पुन्हा एकदा सलग दुस-या दिवशी जोरदार पाऊस झाला. जळकोट मंडळामध्ये ९० मिलिमीटर तर घोणशी मंडळात पन्नास मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच साठवण तलाव तुडुंब भरले आहेत. तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटला असून दोन वर्षानंतर शेतक-यांंना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.  तालुक्यामध्ये दि २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजल्यापासून ते रात्रभर जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता तर जळकोट तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या तिरु ला  प्रथमच मोठा पूर आला होता. सकाळी ८  वाजेपर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता. गावांना जोडणा-या पुलावरून पाणी जात असल्यामुळे सकाळी आठ पर्यंत वाहतूक बंद होती.
अतनूर ते घोणसी दरम्यान जोडणा-या तिरु नदीवर जळकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पर्यायी पूल उभा करण्यात आला आहे परंतु तिरू नदीला आलेल्या पुरामुळे या पर्यायी पुलावरून पाणी वाहत होते यामुळे अतनूर ग्रामस्थांचा पुन्हा एकदा संपर्क तुटला होता. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी जुना पूल पाडून या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे मात्र हे काम अगदी पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केल्यामुळे आता मोठी अडचण नागरिकांना होऊ लागली आहे. अतनूर जवळ उभारण्यात आलेला पर्यायी पूल दोनदा वाहून गेला
होता.
  या मुसळधार पावसामुळे अनेक शेतक-यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे पिकांनाही याचा फटका बसू लागला आहे. पिवळी पडत आहेत  तर तूरही आता पिवळी पडू लागली आहे. असाच पाऊस पडत राहिला तर सोयाबीनचे पीकही हातून जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR