वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी संपूर्ण देश पिंजून काढत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या वाराणसी मतदारसंघावरही त्यांचे बारकाईने लक्ष आहे. मोदींचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, अशी खात्री भाजपला आहे. तरीही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी आग्रही आहेत. त्यांनी मतदारसंघातील अधिकाधिक महिला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सल्ला दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी मतदारसंघातील महिला कार्यकर्त्यांशी, पदाधिका-यांशी संवाद साधला. यावेळी महिलांना आवाहन करताना ते म्हणाले, २५ ते ३० महिलांना एकत्रित करा. ढोल वाजवत, थाळ्या वाजवत, गाणी गात त्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जा. सकाळी दहा वाजेपर्यंत आपण प्रत्येक बूथवर २० ते २५ असे गट केले तर मतदान वाढेल, असा सल्ला मोदींनी दिला. वाराणसी मतदारसंघाचे मतदान अखेरच्या टप्प्यात म्हणजे एक जूनला आहे.