कळंब : सतीश टोणगे
जुनी जाणती मंडळी आजही चर्चा करताना, ‘तो काळच वेगळा होता…’ असे सहज म्हणत असतात. कारण त्यांनी अनेक टप्प्यांवर वेगवेगळी माणसं पाहून त्यांचा अनुभव घेतलेला असतो.राजकारणातही पूर्वी शब्दाला किंमत होती. नेत्याचा पक्षावर, कार्यकर्त्यांवर व कार्यकर्त्यांचा नेत्यावर अति विश्वास होता.
त्यामुळे दोघांतही एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी कायम होती, आज मात्र ती दिसत नसल्याची चर्चा होताना दिसत आहे…आज आदर्श कुणाचा घ्यावा असा माणूस शोधूनही सापडत नाही….लोकसभेच्या निमित्ताने जुने दिवस आठवू लागले आहेत. पक्षाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असे, आज मात्र पक्षाचा निर्णय मान्य न करण्यासाठी चढाओढ लागली आहे.
लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यांत पक्ष दिल्लीहून उमेदवाराचे नाव पाठवायचे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्थानिक नेते प्रामाणिकपणे पार पाडायचे. धाराशिव जिल्ह्यात कुणालाही माहिती नसलेले दिवंगत अरविंद कांबळे हे खासदार झाले. निवडणुकीच्या काळातच ते यायचे, पुन्हा पाच वर्षे गायब. पण कार्यकर्ते त्यांचा प्रचार प्रामाणिकपणे करायचे. अशीच परिस्थिती लातूरची पण होती….तो काळच वेगळा होता, तो काळ आता इतिहासजमा झाला आहे. तसे नेते व कार्यकर्ते पुन्हा होणे नाही…असे ज्येष्ठ मंडळी आठवणीने सांगतात. आज मात्र सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी दुस-याच पक्षात असतो, त्यामुळे कार्यकर्ते पण अस्वस्थ आहेत.