शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील गावांना पाणी पाजणा-या शिरूर अनंतपाळ पंचायत समितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद पडली असून तालुक्यातून येणा-या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही.त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून येथे तातडीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्याला पाणी पाजण्याचे नियोजन करणा-या शिरूर अनंतपाळ पंचायत समितीत तालुक्यातील हजारो नागरिक विविध कामासाठी येतात. त्यांना या ठिकाणी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली जात होती.दरम्यान पंचायत समिती आवारात असलेली पण्यिाच्या पाण्याची व्यवस्था मोडून पडली आहे. सध्या ईमारतीची रंगरंगोटी करण्यात आली मात्र पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिक पंचायत समिती या ठिकाणी आल्यानंतर प्रथम पिण्याच्या पाण्याची शोधाशोध करीत आहेत.अशा वेळी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने आपली तहान हॉटेलवर जाऊन शमवावी लागत आहे. सध्याचा कडक उन्हाळा पाहता, शुद्ध पण्यिाच्या पाण्याची सोय करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे माधव चलमले यांनी केली आहे.