लातूर : प्रतिनिधी
गेल्या चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने पाऊसाच्या पाण्यापासून बचाव कण्याकरिता लागणा-या साहित्यांचे स्टॉल शहरातील विविध भागात लागले आहेत. या स्टॉलवर रेनकोट, छत्री आणि पावसाळी टोपी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. संततधार पावसामुळे फॅशनेबल छत्र्यांची क्रेझ वाढली आहे.
बाजारपेठेत दाखल झालेले छत्र्यांच्या दरात गतवर्षाच्या तूलनेत यंदा काही प्रमाणात वाढले असून ७० ते ८० रुपयात मिळणा-या छत्र्यांची किंमत तब्बल १०० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याच बरोबर पावसाळी टोप्या देखील ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नागरीकांकडून छत्र्यांची खरेदी करण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पावसाळा सुरु झालाकी बच्चे कंपनीपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच रेनकोट, छत्र्यांचे आकर्षण असते. आपली छत्री इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक कसे दिसेल. याकडे विशेष लक्ष देत नागरिक खरेदी करत असून त्यांच्या पसंतीला पडणा-या विविध छत्र्यांनी बाजार सजले आहेत. विशेषकरुन गंजगोलाई, औसा रोड, पाच नंबर चौक, तसेच शहरातील मुख्य रसत्या लगत लावण्यात आलेल्या स्टॉलवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने हजेरी लावण्याने अनेक नागरिकांनी अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या छत्र्या बाहेर काडण्यास सुरूवात केली आहे. तर ग्रामीण भागात घरातील जुनी छत्री दुरुस्त करून घेतली जात आहे. शहरातील काही भागात गतवर्षीप्रमाणे ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा छत्र्या व्यावसायिकांनी बाजारात उपलब्ध केल्या आहेत.
यात मोठी छत्री १५० ते २०० रूपयांना, लहान छत्री १०० ते १२० रूपयांना, प्रिंटेड छत्री १०० ते २०० रूपयांना बाजारात विक्री केली जात आहे. शहरातील विविध भागात मॉडर्न छत्र्या उपलब्ध झाल्या असल्याने विद्यार्थ्यांकडून माठी मागणी केली जात आहे. युवक-युवतींसाठी कमी लांबीच्या विविध डिझाइन्सच्या छत्र्या बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सागीतले आहे.