लातूर : सिध्देश्वर दाताळ
शहरातील तापमानात गेल्या काही दिवसापासून वाढ झाली असून, उन्हाळयाची चांगलीच चाहूल लागली आहे. रस्त्यावरुन येणा-या-जाणा-या नागरीकांची तहान भागविण्यासाठी पूर्वी पाणपोईची सुविधा सुरु केली जायची. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अनेक संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्ती स्वखर्चाने अशा पाणपोई सुरू करायचे मात्र गेल्या दोन – तीन वर्षांत रस्त्या-रस्त्यावर दिसणा-या पाणपोई जणू गायबच झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. परंतु सध्याच्या काळात पाण्याचा व्यवसाय सुरू झाला असून, आता पाणपोई ऐवजी रस्त्यालगत प्रत्येक ठिकाणी बाटलीबंद पाणी विकत मिळू लागल्याने सध्या बाटलीबंदच्या जमान्यात पाणपोई हरवली आहे. त्यामुळे मातीपासून बनविलेले रांजन, माठ नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहेत.
ताहनलेल्याची तहान भागविने ही आपली मराठी माळी संस्कृती आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी शहरातील सामाजिक संस्था, सघटना यांनी सामाजिक कार्याची जान ठेवता रस्त्यालगत, बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणी पाणपोई उभारून ताहानलेल्याची तहान भागवत असे मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून याकडे सर्वानी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सध्या अलीकडे दहा ते वीस रूपयांना पाण्याची बाटली रस्त्यालगत कुठेही सहज उपलब्ध होऊ लागल्याने तहान भागविण्यासाठी नागरीक साध्या पाण्या ऐवजी बाटलीबंद पाणी खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे पाणपाई पध्दत मागे पडू लागली आहे. परंतु ज्यांना बॉटल घेणे शक्य नाही, अशा गोरगरिबांचे हाल होत आहेत. त्यामुळे शहरातील विविध सामाजिक संघटना, मंडळे, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन पुन्हा पाणपोई सुरु करुन तहानलेल्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
दोन-तीन वर्षापूर्वी घराबाहेर पडल्यानंतर लाल रंगाच्या फडक्याने झाकून ठेवलेले रांजण, माठ, त्यावर झाकण आणि पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास असलेली पाणपोई शहरात अनेक ठिकाणी दिसत होत्या, उन्हाळयात तर असे रांजण जागोजागी दिसायचे. त्या रांजणांमधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी प्यायले की तहान भागायची. तहानलेल्यांना पाणी पाजणे ही आपली मराठी मोळी संस्कृती आहे. या संस्कृतीला अनुसरुनच समाज कार्यात अग्रेसर संस्था, संघटना, दानशूर व्यक्त्ती सामाजिक जबाबदारीचे भान जपत वाटसरुंना प्यायचे पाणी उपलब्ध करुन द्यायचे. त्यामुळे शहरात रहदारीचे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणपोई दिसायची.
रस्त्याने येणा-या-जाणा-या वाटसरुंची, गरीब कष्टक-यांची चांगली सोय होत होती. मात्र गेल्या काही वर्षापासून पाणपोईकडे सर्वाचे दुर्लक्ष झाल्याने गोरगरिब,कष्टकरी लोक यांचे बाढत्या तापमाणामुळे हाल होत आहेत. त्यामुळे या लोकांना शुद्ध व थंडगार पाणी मिळावे म्हणून शहरातील विविध भागात पाणपोई पुन्हा सुरु करण्याची गरज आहे.