लातूर : प्रतिनिधी
सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागण्या मार्गी लावण्यासाठी १३ जुलैची दिलेली डेडलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज दि. ९ जुलै रोजी भव्य मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार असून दुपारी १२ वाजता येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकातून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅली मार्गस्थ होणार आहे. लाखोंच्या संख्येत समाज या रॅलीत सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांचे आज दुपारी १२ वाजता नांदेडहून लातुरात आगमन होईल. विवेकानंद चौकात त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत होईल. ते स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यास अभिवादन करतील व छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकात आल्यानंतर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करतील व रॅलीस सुरुवात होईल. गंजगोलाई, महात्मा गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, असा रॅलीचा मार्ग असेल. या मार्गावर असलेल्या सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यास जरांगे अभिवादन करतील. शिवाय गंजगोलाईतील देवीची ते आरतीही करतील.
वाटेत विविध समाजाबांधवांच्या वतीने जरांगे यांचे स्वागत होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ते शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. यावेळी जिजाऊ वंदना होईल. मराठा आरक्षण मागणीसाठी स्वताचे बलीदान दिेलेल्यांना यावळी श्रध्दांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर जरांगे सर्वांना संबोधीत करतील. रॅलीच्या सर्वात पुढे जरांगे यांची गाडी असेल त्यांनतर महिला, मुली, वकील, डॉक्टर्स व सर्व समाजबांधव असतील. विविध सहा वाहनतळ (पार्कींग) असतील. रॅलीसाठी १८ मुद्यांंची आचारसंहिता बनवण्यात आली असून तिची माहिती समाजास देण्यात आली आहे. ती पाळणे सर्वासाठी अनिवार्य करण्यात आले आहे.