मुंबई : प्रतिनिधी
समाजात कुठेही दरी निर्माण होता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. आपल्याला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळ याबाबत सकारात्मक आहेत. दोन्ही समाजातील नेत्यांनी दरी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होता कामा नये याची काळजी सर्वांनी घ्यावी, हे माझे सर्वांना सांगणे आहे. तसेच आमच्या राजकीय नेत्यांनी एकमताने तोडगा काढला पाहिजे. निवळ राजकीय पोळी भाजण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. मतांसाठी हे दुभाजन कोणीही करू नये, असे आवाहन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून राज्याचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर आणखी एक सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना येऊन भेटणार आहे. मात्र, त्यापूर्वीच येत्या अधिवेशनाच्या दुस-या किंवा तिस-या दिवशीच मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे.