20 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरराज्याला महायुतीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी हा लढा

राज्याला महायुतीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी हा लढा

लातूर : प्रतिनिधी
राज्याची सुरक्षितता आज अडचणीत आहे, राज्य विकासात मागे पडले आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या सत्ताधा-यांची सूत्र दिल्लीच्या हाती आहेत. महाविकास आघाडीची एकजूट जशी मुंबईमध्ये आहे, तशी लातूरातही आहे. महाराष्ट्राला महायुतीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार आहे, ही काळा दगडावरची पांढरी रेघ आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी लातूर शहरातील रिंगरोडवरील लक्ष्मी प्रयाग हॉल येथे  महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांची  बैठक झाली. त्यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर शहरप्रमुख विष्णुपंत साठे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उदय गवारे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. सुधाकर शिंदे, आम आदमी पार्टीचे समन्वयक प्रताप भोसले, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर स्मिता खानापुरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लातूर महिला प्रमुख सुनिता चाळक, विद्याताई पाटील, जवळगेकरताई, सोमनाथ झुंजारे, मकबूल वलांडीकर, हरिभाऊ गायकवाड, सचिन  बंडापल्ले, रघुनाथ मदने, फारुख शेख, प्रा. प्रवीण कांबळे  आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टीसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, आता महाविकास आघाडीने आक्रमक झाले पाहिजे, महायुतीची साडेसात वर्षे सत्ता राज्यात होती. त्यांनी राज्यात व लातूरात आज काय काम केले. त्यांनी फक्त्त घरे फोडली, पक्ष फोडले अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही. सामान्य माणूस महाविकास आघाडीचे सरकार कधी सत्तेवर येणार याची वाट पाहत आहे. लोकनेते  विलासराव देशमुख यांच्या काळात टक्केवारीचा शब्द कधी आपण ऐकला नाही, पण आता दररोज आपणाला टक्केवारी ऐकायला मिळते. लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना न्याय  देण्यात येईल, महाविकास आघाडी ही पुढची १५-२० वर्ष  दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपणाला टिकवायची आहे, असे सांगून महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी निवडणुकीच्या कामाला आत्तापासूनच लागावे, असे आवाहन केले.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी प्रास्ताविक केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. सुधाकर शिंदे, आम आदमी पार्टीचे समन्वयक प्रताप भोसले यांनी मनोगत व्यक्त्त करून लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम स्वामी व प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार माजी महापौर स्मिता खानापुरे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR