मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश काढले आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत आपली भूमिका मांडली आणि कायद्यात बसणारे आरक्षण मराठा समाजाला देऊ, असे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन व्यक्त केले. मात्र हे करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारण्याचाही सल्ला दिला आहे.
‘मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल, ही अपेक्षा!’, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवर टाकली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात येऊ नये, यासाठी काल रात्री (२६ जानेवारी) मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दीर्घ बैठक झाली. त्यानंतर सरकारचे अधिकारी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील गेस्ट हाऊस येथे मध्यरात्री पोहोचले. तिथे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. त्यानंतर आज सकाळी (२७ जानेवारी) वाशी येथे जाहीर सभा घेत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर केले.