22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरलातूरच्या गांधी मार्केटमधील उद्यान सुशोभीकरण कामाची पाहणी

लातूरच्या गांधी मार्केटमधील उद्यान सुशोभीकरण कामाची पाहणी

लातूर : प्रतिनिधी
आपल्या लातूरची एक संस्कृती आणि एक जिव्हाळ्याचे कौटुंबिक वातावरण आहे. यातून लातूरचा शिक्षणासह सर्व क्षेत्रात नावलौकिक झाला आहे हे कायम टिकवण्यासाठी आपण लक्ष द्यावे लागेल, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. लातुर शहरातील प्रभाग ८ मधील महात्मा गांधी मार्केटमधील उद्यानाचे नुकतेच नूतनीकरण दुरुस्ती करण्यात आली असून या उद्यानातील कामांची पाहणी दि. २३ जानेवारी रोजी माजी मंत्री आमदार देशमुख यांनी केली व उद्यानातील कामाबद्दल समाधान व्यक्त्त केले.
लातूर शहराच्या सुविधेत भर टाकणारे हे उद्यान डीपीडीसी मधून जवळपास ८१ लाख मंजूर करुन  उद्यान सुशोभित करण्यात आले आहे. या उद्यानात विविध प्रकारची फुले,फळझाडे व शोभेची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच बाल गोपाळ यांच्या सह लातुर शहर व गांधी मार्केट परिसरातील नागरिकाना या उद्यानात बैठक व्यवस्था, वांिकग ट्रॅक, तसेच सुरक्षा रक्षक कॅबिन, स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे.
या प्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, या ठिकाणी कांही महिन्या पूर्वी भेट दिली असता ही जागा दुर्लक्षित होती या जागचे सुशोभीकरण व्हावे अशी येथील नागरिकांची मागणी होती. येथील नागरिक व्यापार्यांना विसावा मिळावा यासाठी आपण याचे काम हाती घेतले. आता या उद्यानाची देखभाल चांगल्या प्रकारे राखायला हवी यासाठी आपल्याला एक लातूरकर म्हणून जबाबदारी निभवावी लागेल. महात्मा गांधी मार्केट ची स्वछता नियमितपणे व्हावी यासाठी मनपा आयुक्तांना सूचना केली जाईल असे ते म्हणाले. तसेच येणा-या पंधरा दिवसांत या ठिकाणी असलेल्या नागरी समस्या,मच्छी मार्केट  व या भागातील स्वच्छता, गांधी मार्केट व्यापारी संकुल गाळे दुरुस्ती सह इतर समस्या कडे नियमितपणे लक्ष केंद्रित केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलतांना आमदार अमित देशमुख म्हणाले की,या उद्यनाला आणखी काय नवीन करता येईल हे देखिल पाहिले जाईल, गांधी मार्केट मध्ये असलेलं गाळ्याचे ऑडिट करून घ्यावे,या व्यापारी संकुलाचे एक असोसिएशन करून सर्वांनी या मालमत्तेची देखभाल आणि दुरुस्ती बाबत पुढाकार घ्यावा जेणेकरून आपल्याला मनपाला सांगून पावले उचलता येतील.आशा सूचना उपस्थित मनपा अधिकार्याना त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान लातूरच्या कायदा सुव्यवस्था ढासळत असून ही कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा लागेल जेणेकरून  लातूरच्या शैक्षणिक पॅटर्न कायम ठेऊ शकू याकरिता पक्ष कार्यकर्ते यांनी एक नागरिक म्हणून सतर्क रहावे.
आपल्या लातूरची एक संस्कृती आहे आणि ती टिकवण्यासाठी व कौटुंबिक वातावरण राहील याची देखील आपण लक्ष द्यावे लागेल. गावभागात येणा-या काळात १०० खाटांचे रुग्णालय ज्यात रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासोबत मुलींना नर्सिंग अभ्यासक्रम शिक्षण दिले जाणार आहे ,लातुर शहराला लवकरच १०० इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत, नांदेड रस्त्यावर ३०० खाटांचे जिल्हा रुग्णालय कामासाठी देखील गती मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी उपस्थित सर्व म.गांधी मार्केट मधील व्यापारी,परिसरातील नागरिक यांच्याकडून या
कामाबद्दल आभार व्यक्त्त करण्यात आले.
यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को. ऑप. बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लक्ष्मण कांबळे, गणेश एस.आर. देशमुख, गोरोबा लोखंडे,  अभिजित इगे, मीनाताई सुर्यवंशी, अकबर माडजे, प्रा. डॉ. आनंद पवार, रत्नाकर औसेकर, अ‍ॅड. फारुक शेख, प्रा .प्रवीण कांबळे, अभिजित पतंगे, बालाजी झिपरे, अ‍ॅड. देवदास बोरुळे पाटील, करीम तांबोळी, पिराजी साठे ,सुरज राजे, इनायत सय्यद, रईस टाके, दीपक डूनगड, त्र्यंबक कुंभार, दगडूअप्पा मिटकरी, जफर पटेल, राजाभाऊ झिपरे, प्रवीण सूर्यवंशी, मोहन सुरवसे यांच्यासह जय भवानी चॅरिटेबल ट्रस्ट पदाधिकारी, मच्छी मार्केट असोसिएशन,  व्यापारी,मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व्यंकटेश पुरी यांनी केले तर शेवटी महेश कोळ्ळे यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR