23.5 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeमहाराष्ट्रवादग्रस्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ हकालपट्टी करा

वादग्रस्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ हकालपट्टी करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : प्रतिनिधी
आगामी काळात होणा-या विधानसभा निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्या यासाठी वादग्रस्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला या अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत. शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली आहे. मात्र असे असताना भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारने त्यांना जानेवारी २०२६ पर्यंत नियमबा रीत्या बढती दिली आहे. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबा काम करणे तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी आपल्या पत्रात केला आहे.

पत्रात पटोले यांनी म्हटले आहे की, रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या त्यांच्याकडे पोलिस महासंचालक (डीजीपी) तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) अतिरिक्त कार्यभार आहे. रश्मी शुक्ला यांची जन्मतारीख जून १९६४ नुसार, त्यांची जून २०२४ ही निवृत्तीची तारीख; परंतु महाराष्ट्र पोलिस कायद्याचे थेट उल्लंघन करून त्यांचा कार्यकाळ बेकायदेशीरपणे जानेवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्याच्या डीजीपीचा कार्यकाळ दोन वर्षे किंवा निवृत्तीपर्यंत असतो.

रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती वादग्रस्त असून त्यांनी बेकायदेशीर कामे केली असून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमक्या दिल्या आहेत. पटोले म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे, अशा परिस्थितीत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवावे जेणेकरून राज्यात निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात.

रश्मी शुक्ला या जून १९६४ मध्ये जन्मलेल्या आणि १९८८ च्या भारतीय पोलिस सेवेच्या (कढर) बॅचच्या अधिकारी आहेत. रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी म्हणून नाव देण्यात आल्याने त्या वादात सापडल्या होत्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून आरोपांच्या फैरी
रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि धमक्या देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अनेकदा खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. रश्मी शुक्ला या भाजपसाठी राजकीय प्रचारक म्हणून काम करत आहेत. रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एसीबीच्या प्रभारी पोलिस महासंचालक या नात्याने त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि सदस्यांना पोलिस स्टेशन आणि एसीबीच्या कार्यालयात बोलावून अधिकाराचा गैरवापर करून त्यांना जबरदस्ती धमकावले, राज्य गुप्तचर विभागात काम करतानाही त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR