सोलापूर- श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून आपल्याला अडचण करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. त्यांना बाजूला सारून विकासाच्या कामासाठी एकजूट दाखवून द्यायची आहे. लोकसभेप्रमाणे आगामी काळात विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपली एकजूट कायम ठेवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले.
कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गेल्यावर्षी पाडण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात काडादी बोलत होते. नूतन खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी हे होते.
यावेळी बोलताना नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी, भापजच्या सूडबुध्दीच्या राजकारणाचा काडादी यांना त्रास होत असल्याचे सांगितले. आगामीह्याने, काळात सोलापूरच्या विकासासाठी आपण सदैव धर्मराज काडादी आणि श्री सिध्देश्वर परिवार यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांनी चिमणी पाडकाम करताना प्रशासनाने केलेल्या मुजोरीच्या आणि चिमणी वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ सभासद हरीश कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक बिराजदार यांनी केले.
या काळा दिन कार्यक्रमास संचालक गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, अमर पाटील, विलासराव पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, विद्यासागर मुलगे, शिवानंद बगले (पाटील), अरुण लातुरे, सिध्दाराम व्हनम स्वीकृत संचालक हरिश्चंद्र आवताडे, महादेव जम्मा, कार्यकारी संचालक रवींद्र पाटील, सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी सदस्य रतन रिक्के, प्रभुराज मैंदर्गी, माजी संचालक बाळासाहेब बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिनेश शिंदे, सिद्रामप्पा मुलगे, बिपिन करजोळे उपस्थित होते. कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून चिमणी पाडण्याचा निषेध केला.