लातूर : प्रतिनिधी
लातूर व परिसरातील अनेक कवी, कवयित्रींच्या सहभागामुळे शब्दपंढरी प्रतिष्ठानचे कविसंमेलन जयक्रांती महाविद्यालयाच्या सभागृहात प्रचंड उत्साहात झाले. कविनीं विषयांवर कविता सादर करुन रसिकांची मने जिंकली. यावेळी बोलताना प्रा. गोविंद घार म्हणाले, कवितेत समाजमनाचे प्रतिबिंब उमटते. जे न देखे रवि ते देखे कवी, असे म्हटले जाते. कवी कल्पना विश्वातील खुप मोठा घटक आहे. ज्वलंत विषयांवर शब्दांची शस्त्रे करुन समाजमन गदागदा हलवून टाकण्याची अचाट शक्ती कवींकडे असते. ही शक्ती उपजत असते. ही निसर्गाची खुप मोठी देण आहे. कवींचा एखादा शब्द अनेकांचे जीवन सावरु शकतो तर कवींचा एखादाच कठोर शब्द अनेकांना वेदना देणाराही ठरतो.
कवी संमेलनात स्वच्छ,निर्मोही,खरे आहोत आम्ही.. ज्ञान देणारे झरे आहोत आम्ही…या काव्यपंक्त्तीतून दयानंद बिराजदार यांनी शिक्षकाची महती सांगितली. कवयित्री तहेसीन सय्यद यांनी पाझरते हृदयातून तुझ्या…सदाच प्रेम, वात्सल्य…वारसा दिलास हाच तू…आम्हा सर्वांना अमूल्य…या ओळी सादर करुन आईचे थोरपण सांगितले. योगिराज माने यांच्या अक्षर अक्षर गंधित झाले…या जगण्याचे संगीत झाले…नाव सखिचे लिहिले आणिक…पान वहीचे रंगीत झाले…या कवितेमुळे सभागृहास गुलाबी रंग चढला. कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ गझलकार जोश लातूरी यांनी भूषविले. देवदत्त मुंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर राजेंद्र माळी यांनी बहारदार सूत्रसंचलन केले. कविसंमेलनास साहित्यप्रेमी व काव्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.