लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील हरंगूळ येथील कन्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे ही पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. ३० मार्च २०२४ रोजी तिचे पुणे येथून अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या अमानुष खुनाचा खटला चालविण्यासाठी फास्टट्रॅक कोर्ट स्थापन व्हावे. सदरील फास्टट्रॅक कोर्ट लातूर येथे चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान स्थगन प्रस्तावाद्वारे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात माजी मंत्री आमदार आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार, दि. १ जुलै रोजी स्थगन प्रस्ताव मांडून लातूर तालुक्यातील हरंगूळ येथील सूर्यकांत सुडे हे आपले सहकारी असून आपल्या सोबत संस्थेत कार्यरत आहेत. त्यांची कन्या भाग्यश्री सुडे ही पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. तिचे अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आला आहे.
यातून राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे, असे सांगितले. या वेळी सभागृहात पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले, लातूर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासह यलम समाज बांधवाची, अशी मागणी आहे की, या अमानुष खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि. १२ एप्रिल २०२४ रोजी लातूरकरांनी लातूर शहरात मोर्चा काढला होता. राज्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून राज्य शासनाने खबरदारी घ्यावी. भाग्यश्री सुडेचा अपहरण व खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा. सदरील फास्टट्रॅक कोर्ट लातुरात चालवावे, अशी मागणी त्यांनी केली.