कांगडा : वृत्तसंस्था
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, राज्यात तीन दिवसांच्या हिमवृष्टीमुळे ६५० हून अधिक रस्ते आणि २३०० पेक्षाही अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात १० पेक्षाही अधिक वाहने वाहून गेली. चंबा आणि मनालीमध्येही शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
जम्मू आणि काश्मीरातील गुलमर्गमध्ये ११३ सेमी आणि सोनमर्गमध्ये ७५ सेमी सर्वाधिक बर्फवृष्टी झाली. खराब हवामानामुळे जम्मू-काश्मीर सरकारने शाळांमधील हिवाळी सुट्टी ६ दिवसांनी वाढवली आहे. १ आणि ३ मार्च रोजी होणा-या इयत्ता १० वी ते १२ वीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.
सततच्या पावसाने हिवाळ्यातील पावसाची ५० टक्के कमतरता भरून काढली आहे. त्यामुळे नद्या व इतर जलस्त्रोतांच्या पातळीत ३ ते ४ फुटांनी वाढ झाली आहे. रामबन जिल्हा बटोत येथे सर्वाधिक १६३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यानंतर कटरा येथे ११८ मिमी आणि बनिहालमध्ये १०० मिमी पाऊस झाला.
दरम्यान, यंदा सरासरीपेक्षा जास्त उष्मा असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही दक्षिणेकडील भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. या काळात उष्णतेची लाटही येऊ शकते. बदललेल्या हवामानाचा परिणाम मैदानी भागावरही झाला आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात पावसानंतर तापमानात घट झाली आहे. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये १०.९ मिमी पाऊस झाला. येथील तापमानात ३ अंशांची घट नोंदवण्यात आली. त्याच वेळी, अमृतसरमध्ये १७.५ मिमी पाऊस, गुरुदासपूरमध्ये २०.७ मिमी आणि पंजाबमधील होशियारपूरमध्ये २०.५ मिमी पाऊस पडला.