बारामती : अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही, असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले आहे. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत अमोल कोल्हे यांनी आज मत व्यक्त केले. अजित दादा स्वत:च्या गावासह मतदारसंघातील शेतक-यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
किल्ले शिवनेरीपासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू झाला. या मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्यावर अजित दादांच्या आव्हानाचे कोणतेही दडपण नाही, असे मोर्चाचा शुभारंभ करताच स्पष्ट केले. चार दिवसांचा मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातून अन् बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. याद्वारे अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत, असा अप्रत्यक्ष टोला खासदार कोल्हे यांनी लगावला. अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळेही या मोर्चाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ होऊ शकते तर खाणा-यांना रास्त किमतीत उपलब्ध करून त्यावर सबसिडी मिळावी. शेतक-यांच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. आढळराव गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत.आढळराव यांना शुभेच्छा. ते एक वयस्कर नेते आहेत डिजिटल युगाची त्यांना ज्ञात नसावी. कांदा निर्यात बंदी उठवावी अशी आमची साधी मागणी आहे. निवडणूक हा गौण भाग आहे, मिळणा-या पदाला काय चाटायचे आहे का? आमच्यासाठी शेतक-यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे अमोल कोल्हे म्हणाले.
अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी मी बोलणार नाही. ही यात्रा सर्वसामान्य आणि शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात आहे. कोणी हिला रोखू शकणार नाही, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
किती जणांचा कांदा खरेदी झाला?
कांदा उत्पादक शेतक-यांना पैसे मिळायला लागले, तेव्हा कांदा निर्यात धोरण आणले. आपण रस्त्यावर उतरलो तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जपानमधून ट्विट केले, शेतक-यांचा कांदा नाफेडद्वारे खरेदी करणार. किती जणांचा कांदा खरेदी झाला, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
आता लढायचे, थांबायचे न्हाय
दूध उत्पादक शेतक-यांची फसवणूक करतात. सरकारी दूध डेअरीमध्ये ५ टक्के अनुदान मात्र खाजगी दूध डेअरीमध्ये अनुदान नाही. असा भेदभाव का? २५ लाख कोटींचे कर्ज मोठ्या उद्योजकांचे माफ होते, पण शेतक-यांचे कर्ज माफ होत नाही. त्या शेतक-यांना आत्महत्या करावी लागत असेल तर सरकारला लाज वाटायला हवी. आता या मोर्चाबद्दल बोलतायेत. त्या मोठ्या व्यक्तींना काही वाटत असेल तर त्यांनी शेतक-यांचे हित जोपासावे. आता लढायचे, थांबायचे न्हाय, असे अमोल कोल्हे म्हणाले.