पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते तर एक चांगले प्रशासक देखील होते. आम्ही त्यांच्या सर्व किल्ल्यांचा विकास करू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केले आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे,’’ असेही मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किल्ल्यावर दाखल झाले.
शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. त्याचबरोबर पाळणा म्हणून शिवजयंती उत्साहामध्ये साजरी केली. यावेळी तरुणांची मोठी गर्दी किल्ल्यावर दिसून येत आहे. शिवनेरी किल्ल्यावर फुलांची आरास आणि सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवनेरीवर फडणवीस म्हणाले की, जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आजपासून पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा ४००वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. शिवनेरीवर आल्यावर आपल्याला जी स्वराज्याची स्फूर्ती मिळते ती घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व लोक येथे येत असतो, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.