22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रकोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले

कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले

सांगलीची सिंचन मागणी वाढली

सातारा : सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती वाढल्याने पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालीन द्वार खुले करण्यात आले आहे.
त्यामुळे सांगलीसाठी द्वारमधून ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर धरणात ६० टीएमसीच साठा शिल्लक आहे.

सातारा जिल्ह्यात मोठी धरणे अधिक आहेत. या धरणातील पाण्याची तरतूद ही साता-याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठीही करण्यात आलेली आहे. मात्र, गेल्यावर्षी अपु-या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली नाहीत. तर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण कोयना असून याची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाणीसाठाही ९५ टीएमसीपर्यंत पोहोचलेला. त्यामुळे धरण भरण्यास १० टीएमसी पाणी कमी पडले. त्यातच गेल्यावर्षी परतीचा पाऊसही अपेक्षित झाला नाही.

परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी झळा जाणवत होत्या. अशातच शेतीसाठीही पाणी कमी पडत होते. त्यामुळे सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून नोव्हेंबरपासूनच कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाली. या मागणीनुसार कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे धरणातून मागील तीन महिन्यांपासून सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगलीसाठी धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून त्यातून २१०० क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात होते. तर धरणाच्या आपत्कालीन द्वारमधील विसर्ग थांबविण्यात आलेला. मात्र, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे आपत्कालीन द्वार पुन्हा खुले करण्यात आले आहे. त्यामधून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सांगलीतील सिंचनासाठी एकूण २६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR