सोलापूर :
निरोगी आरोग्यासाठी विषमुक्त सेंद्रिय शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांनी आता भविष्याचा वेध घेऊन शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे मत, सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केले.
गवळी वस्ती तालीम संघ मानाचा गणपती यांच्या वतीने शेती फायद्याची हा शेती विषय डोळ्यासमोर ठेवून शनिवारी तालीम संघाच्या वतीने खरीप व रब्बी हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. लालासाहेब तांबडे बोलत होते. सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रतापसिंह परदेशी अध्यक्षस्थानी होते. एका बँकेचे मॅनेजर भगवान बनसोडे यांनी बँकेच्या शेती कर्ज विषयाबाबत मार्गदर्शन झाले. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
डॉ. तांबडे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. जवळपास ६५ टक्के मनुष्यबळ शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न
दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीतील तीन आमुलाग्र घटकांवर भर देण्यावर निर्णय घेतला आहे. शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. लोक आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जागृत झाल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत आहेत. रसायनयुक्त धान्य आपल्याला नकोसे वाटत आहेत. त्याचे बरेचसे वाईट परिणाम शरीरावर होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि प्रचार करण्यात येत आहे. दुसरे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय जोपर्यंत आपण जोडत नाही, तोपर्यंत आपली शेती फायदेशीर होणार नाही, हे सर्वांना कळून चुकले आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत, असेही डॉ. तांबडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करून तसेच रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमास रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी, अरुण घुले, वामन वाघचौरे, औदुंबर जगताप, नागनाथ पवार, सुनील कदम, लहू गायकवाड, दत्तात्रय गणेशकर, शाम गांगर्डे, डीसीसी बँकेचे शाखाप्रमुख राजेश गवळी, शिवदास चटके, संदीप काशीद, शेखर कवठेकर, विष्णू जगताप, अरविंद गवळी, बाळासाहेब घुले, बाळासाहेब गवळी, विक्रम पाटील, विजय घुले, सूरज काशीद, कलुबर्मे, प्रभाकर इंगळे, प्रशांत भगरे, लक्ष्मण मेकाले, अशोक बनसोडे, सचिन कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शेजबाभळगावचे कृषिभूषण शेतकरी शशिकांत पुदे, कामतीचे द्राक्ष बागायतदार प्रताप पाटील, कुरुलचे केशर आंबा उत्पादक शेतकरी समाधान वाघमोडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील केळी व पपई उत्पादक शेतकरी आशिष पाटील, मोहोळ तालुक्यातील कोथाळे येथील कारले उत्पादक शेतकरी रवींद्र पवार यांच्यासह वृक्षमित्र मनोज देवकर यांचा कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.