अहमदपूर : प्रतिनिधी
येथे दुस-या जागल साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये एकाहून एक सरस अशा कविता सादर करीत निमंत्रित कवींनी उपस्थितांना मंत्रमुक्त केले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अनिल चवळे हे होते तर महेंद्र खंडागळे, दीपक बेले, रंजना गायकवाड, वर्षा लगडे माळी, सय्यद शहरात बेगम कामाक्षी पवार ,भागवत येनगे या कवींनी सहभाग नोंदवला.
या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री रंजना गायकवाड यांनी केले. यावेळी महेंद्र खंडागळे यांनी कविता अभंग स्वरूपात मांडताना काय तो सोहळा वर्णावा कितीदा, सावळा विठोबा मनी वसे ही कविता सादर केली. कवयीत्री वर्षा लगडे, माळी यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावरील आपली कविता सादर केली. कवी अनिल चवळे मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना निसर्गाशी नाते जोडणारी, गाव माझा नदीकाठचा किती सुंदर असायचा, गावकरी सुखदु:ख एकमेकात वाटायची, छोट्याशा गावात माणुसकी दाटायची.ही कविता सादर केली.
कवयित्री रंजना गायकवाड यांनी जग काट्याची ही बाग, हे चातक झाले डोळे, माये तू ये परतुनी. ही कविता सादर करून उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी कवी दीपक बेली यांनी शेतक-यांवरील दमदार कविता सादर केली. कवयित्री कामाक्षी पवार यांनीही आपली सुंदरचना श्रोत्यापुढे ठेवली तर कवी भागवत यांनी आपली गांधी ही कविता सादर केली. तब्बल दीड तास या रंगलेल्या कवी संमेलनाचा निसर्गरम्य वातावरणात उपस्थित श्रोत्यांनी आनंद घेतला. सूत्रसंचालन जिलानी शेख यांनी तर आभार प्रा. गुरुनाथ चवळे यांनी मानले.