24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रदिव्याज फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम

दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम

मुंबई : गणेश विसर्जनानंतर दरवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. यंदाही गणेश विसर्जनानंतर दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. १८) वर्सोवा किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

बुधवारी सकाळी अमृता फडणवीस समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी वर्सोवा येथे पोहोचल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मंडळी उपस्थित होती. यादरम्यान, मंगलप्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
आपण मुंबईतील चौपाटीवर असलेला कचरा साफ करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेता. पण आता आपण राज्यातील राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी सुद्धा पुढाकार घ्यायला हवा, अशी मी आपणास विनंती करतो. अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतलेले आहे.

मुलामुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यामुळे मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणेन, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. त्यामुळे नेहमी कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असणा-या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
क्षेत्र काणतेही असो स्वच्छता हवी : अमृता फडणवीस
अमृता फडणवीस यांनी म्हटले की, आपण शहरं, नद्या, समुद्र स्वच्छ ठेवायला पाहिजेत. आपण ते स्वच्छ राहतील याची काळजी घेऊ तेव्हाच आपली आर्थिक प्रगती साधू शकतो. कोणत्याही प्रकारची आर्थिक प्रगती साधण्यासाठी आधी आपण आपली शहरं स्वच्छ ठेवायला हवीत. आपण देव, धर्म मानणारे लोक आहोत. देवाला स्वच्छता आवडते. त्यामुळे क्षेत्र कोणतंही असो, आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. मग ते राजकारण असो किंवा आपले मन. कोणत्याही सेक्टरमध्ये काही ना काही घाण असते. त्यामुळे आपण स्वच्छतेवर भर द्यायला हवा. कॉर्पोरेट असो की पॉलिटिक्स आपण सर्वत्र स्वच्छता ठेवायला हवी, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR