30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रधारावीत तणाव; मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद

धारावीत तणाव; मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद

शेकडो लोक उतरले रस्त्यावर

मुंबई : मुंबईतील धारावीतून मोठी बातमी समोर येत आहे. धारावीत असणा-या एका मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी बीएमसीचे एक पथक गेले असता मशिदीचा अवैध भाग तोडण्यास विरोध करणा-या नागरिकांनी गोंधळ घातला आणि बीएमसी अधिका-यांच्या वाहनांवर दगडफेक केली.

यामुळे धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे शेकडोच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला आहे. दरम्यान, धारावीतील वाढता तणाव पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे. तसेच तेथे उपस्थित असणा-या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी पोहोचल्या असून, शांततेचे आवाहन करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावीत एक मशीद आहे. मात्र या मशिदीचा काही भाग अवैध असल्याचे सांगितले जात आहे. धारावी शहरातील ९० फूट रोडवरील २५ वर्षे जुनी अशी ही सुभानिया मशीद आहे. या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी आज बीएमसीचे पथक धारावीत गेले होते. दरम्यान, मशिदीचा अवैध भाग तोडला जाणार आहे, याची माहिती धारावीतील नागरिकांना मिळाल्यानंतर ही कारवाई रोखण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच याठिकाणी आंदोलन सुरू केले होते. धारावीतील लोकांचे म्हणणे आहे की, ही मशीद २५ वर्षे जुनी आहे. मशिदीसोबत लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.

त्यामुळे ही मशीद पाडू नये. परंतु बीएमसी अधिकारी आज या मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी धारावीकडे रवाना झाले. त्यामुळे धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू देणार नाही, अशी ठाम भूमिका धरावीकरांनी घेतली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मशिदीवर कारवाई केली जाऊ नये : खा. वर्षा गायकवाड

दरम्यान, या मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये, यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदारांनी एक्सवर पोस्ट करून लिहिले की, धारावीतील मेहबूब-ए-सुभानिया मशिदीला बीएमसीने पाडण्याच्या नोटीसबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि लोकांच्या भावना जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. संबंधित अधिका-यांशी बोलून कारवाई रोखली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तरीदेखील आत बीएमसीचे पथक कारवाईसाठी धारावीत पोहोचले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR