लातूर : प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाईज युनियन औरंगाबादच्या वतीने ५५ वा बँक राष्ट्रीयकरण दिवस लातूर येथे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी बँक कर्मचारी संघटनेचे कॉ. धनंजय कुलकर्णी होते. बँकांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. बँक कर्मचा-यांचा त्यास विरोध आहेच परंतू, या लढ्यात लोकसहभाग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन काँ. धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी कॉ. उत्तम होळीकर, कॉ. दीपक माने, अधिकारी संघटनेचे कॉ. विवेक पद्रे, कॉ. किशोर तसेच लातूर शहरातील व आसपासच्या परिसरातील अनेक बँक कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे मुखपत्र असलेले ‘बुलेटीन’या मासिकाचे प्रकाशन कॉ. धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी १९६९ साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंधिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण ज्या कारणासाठी केले होते ते उद्देश अजूनही पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे अजूनही भारत देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या देशातील बँका या सरकारच्या मालकीच्या असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. वेळोवेळी बँकांच्या राष्ट्रीयकरणावर त्या त्या वेळेसच्या सरकारकडून घाला घालण्याचा प्रयत्न होतो परंतु बँक कर्मचारी संघटना म्हणून आपण आजपर्यंत त्याला विरोध करीत आलेले आहोत आणि याही पुढे आपल्याला बँकांच्या खाजगीकरणाला विरोध असेल, असे नमूद केले. बँक खाजगीकरण विरोधी लढ्यामध्ये आपण सामान्य जनतेला सामील करुन घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
तसेच १९८७ सालापासून आम्ही बुलेटिन या मासिकाची सुरुवात केली होती आणि सलग २१ वर्ष आम्ही ते मासिक चालवले मधल्या काळामध्ये अनेक कारणांमुळे काही दिवस हे मासिक बंद पडले होते परंतु संघटनेच्या नवीन सभासदांनी पुढाकार घेऊन हे मासिक पुन्हा एकदा नव्याने सुरु केल. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संघटनेच्या सभासदांसाठी असलेल्या या मासिकामध्ये बँकिंग, वित्तीय तसेच कामगार संघटना विषयक अनेक बातम्या आपल्यापर्यंत या मासिकांमधून पोहोचतील, असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉ. आदित्य देशपांडे, कॉ. परमेश्वर बडगिरे, कॉ. श्रीकृष्ण मांडे, कॉ. रेश्मा भवरे, कॉ. महेश घोडके, कॉ. सुधीर मोरे इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले.