बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अर्धमसला गावात प्रार्थनास्थळात स्फोटाची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री २.३० वाजता घडली असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक वादातून ही घटना घडली आहे. यामध्ये कोणीही जखमी नसून, पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज गुढीपाडवा आणि उद्या ईद आहे. अशा पार्श्वभूमीवर झालेली ही घटना वैयक्तिक वादातून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
मशिदीत स्फोट घडवणा-यांचा २० मिनिटांत गेम ओव्हर
रविवारी मध्यरात्री अडीच वाजता बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीत मोठा स्फोट घडला आहे. हा स्फोट घडल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासांत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे गावात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र पोलिसांच्या तत्परतेमागे एक सरपंच असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित सरपंचामुळेच पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावणे शक्य झाले. कारण ज्यावेळी हा स्फोट घडला, त्यावेळी अर्धमसला गावच्या माजी सरपंचांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. शिवाय त्यांनी पुढच्या २० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यांना गावातील इत्थंभूत माहिती असल्याने पोलिसांना घटनेचा तपास करणे सोपे गेले आणि अवघ्या तीन ते चार तासांत संशयितांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे, याबाबतची माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.
मशिदीत जिलेटिन कांड्यांचा वापर
नवनीत कॉवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मशिदीत जिलेटिन कांड्यांचा वापर करून हा स्फोट घडवला आहे. हा स्फोट घडल्यानंतर अर्धमसला गावच्या सरपंचांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि ते अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. सरपंचाच्या सहकार्यामुळे आम्ही दोन्ही आरोपींना सकाळी सहा वाजता अटक केली. सर्वांनी शांततेत राहावे असे आवाहन बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.
किरकोळ वादातून स्फोट
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूस मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून हा स्फोट घडवल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी स्फोट घडवला, तेव्हा आरोपी दारूच्या नशेत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. गाव शांत आहे. घटनेनंतर मशीद स्वच्छ केली आहे. गावातील सगळे लोक एकत्रित रहात आहोत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गावातील मुस्लिम बांधवांनी केले आहे.