मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात भाजपला विदर्भ आणि मुंबई विभागात चांगलाच फटका बसला. विदर्भातील दहा जागांपैकी महायुतीला तीन जागा मिळाल्या. त्यात बुलढाण्याची जागा श्ािंदे सेनेची आहे. दुसरीकडे मुंबईतील सहा जागांपैकी दोन जागा भाजपला मिळाल्या. त्यात एका जागेवर शिंदे सेनेचा निसटता पराभव झाला आहे. त्याची पाच प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे…
महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळवता आले नाही, किंबहुना अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राज्यात आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती. तसेच काही प्रमाणात नरेटिव्हच्या विरोधात होती. संविधान बदलणार असा नरेटिव्ह विरोधी पक्षांकडून तयार करण्यात आला होता. तो नरेटिव्ह ज्या प्रमाणात थांबवायला हवा होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही, हे त्यांनी मान्य केले.
तरुणांनी भाजपची साथ सोडली : विदर्भात लोकसभेच्या १० जागा आहेत. त्यात काँग्रेसने चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, अमरावती आणि भंडारा येथे विजय मिळवला. वर्धामध्ये राष्ट्रवादीचा विजय झाला तर यवतमाळ-वाशिममध्ये उद्धव सेनेने बाजी मारली. भाजपला केवळ नागपूर आणि अकोल्याच्या जागेवर समाधान मानावे लागले. त्यातील नागपूरची जागा नितीन गडकरी यांच्या कामगिरीमुळे निवडून आली. इतर ठिकाणी तरुण, महिलांनी भाजपची साथ सोडली.
मराठा आंदोलनाचा फटका : मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसला. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे हा समाज महायुतीवर विशेषत: भाजपवर नाराज होता. तसेच मुस्लिम समाजानेही महायुतीला साथ दिली नाही. विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचा मुद्दा प्रचारात लावून धरला. यामुळे दलित समाज भाजपपासून दूर गेला.
असली पक्षांनाच साथ : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बंडखोरी झाली. ही बंडखोरी भाजपने घडवून आणल्याचा प्रचार शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला. यामुळे राज्यातील जनतेची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ मिळाली. राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना सहानभूतीचा फायदा मिळाला.
शेतक-यांची नाराजी : कापूस, सोयाबीन आणि कांदा हा विषय शेतक-यांसाठी जिव्हाळ्याचा होता. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. त्यामुळे शेतकरी नाराज होते. तसेच कापूस आणि सोयाबीनला भाव नव्हता. त्यामुळे शेतक-यांनी भाजप आणि महायुतीची साथ सोडली.
पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी : भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुस-या पक्षातील लोकांना संधी दिली गेली आहे. अन्य पक्षातून आलेल्या लोकांना पदेही दिली गेली. यामुळे पक्षासाठी वर्षानुवर्ष मेहनत करणारे कार्यकर्ते नाराज झाले. त्या नाराजीचा फटका भाजपला बसला.