नाशिक : कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने गेल्या आठवड्यात कांद्याची निर्यातबंदी करण्यात आली. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार रुपयांच्या आत आले आहेत. येवला बाजार समितीत कांद्याला पंधराशे रुपये सरासरी बाजारभाव जरी मिळत असेल तरी बाराशे ते तेराशे रुपयांनी कांद्याची खरेदी होत आहे.
यामुळे शेतक-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरत असताना निर्यातबंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे. नेपाळमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो २०० तर श्रीलंकेत ३०० रुपये किलोवर गेले आहेत.
भारतातील कांदा निर्यातबंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे.
एकीकडे भारतात कांद्याचे दर घसरत असताना इतर देशांमध्ये कांद्याचे दर वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांत नेपाळमध्ये कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. दहा दिवसांपूर्वी नेपाळमध्ये शंभर रुपये प्रतिकिलो मिळणार कांदा आता दोनशे रुपये किलोवर गेला आहे. नेपाळने मागील आर्थिक वर्षात ६.७५ अब्ज रुपयांचा १९० टन कांदा आयात केला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये भारताने कांदा निर्यातबंदी करताच किंमत २५० रुपये प्रति किलोवर गेली आहे.
श्रीलंकेत कांदा ३०० रुपये प्रति किलो
श्रीलंकेत भारताच्या निर्यातबंदीचा परिणाम कांद्यावर झाला आहे. कांद्याची किंमत ३०० रुपये प्रति किलोवर गेली आहे. मालदीवसुद्धा कांद्याबाबत भारतावर अवलंबून आहे. मालदीवमध्ये २०० ते ३५० रुपये प्रति पॅकेट कांदा विकला जात होता. तो भारताने कांदा निर्यातबंदी करताच ५०० रुपये पॅकेटपासून ९०० रुपये पॅकेटपर्यंत गेला आहे. भूतानमध्ये ५० नगुल्ट्रम प्रति किलो कांदा विकला जात होता. भारताच्या निर्णयानंतर आता हा दर १५० रुपये प्रति किलोवर गेला आहे. बांगला देशात कांदा २०० प्रति किलो रुपयांवर गेला आहे. हा कांदा पूर्वी १३० रुपये प्रति किलोवर होता.