21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ११ जुलैला दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्विकारणार आहेत. दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये १५ व्या अ‍ॅग्रीकल्चर लीडरशिप कोन्क्लेव्हमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर यांसारखे उपक्रम राबवले असून १.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे १२३ मेगा सिंचन प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

यासोबतच ४.६३ लाख शेतक-यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरण, सूक्ष्म बाजरी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थान, तसेच एक रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतक-यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.

पुरस्काराला देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अ‍ॅग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत प्रमुख भागधारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँड इत्यादी देशांचे राजदूत, तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आदी राज्यांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, अखिलेश यादव, दिवंगत नेते प्रकाशसिंह बादल, वर्गीस कुरियन, एम. एस. स्वामिनाथन आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला असून स्वामिनाथन यांनी १० वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. २०२३ करिता सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार तर २०२२ करिता तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना देण्यात आला होता.

आंध्रला मिळाला
होता पहिला पुरस्कार
सन २००८ पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR