23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूर‘मांजरा’चे पाणी ‘तावरजा’ला नवसंजीवनी ठरणार!

‘मांजरा’चे पाणी ‘तावरजा’ला नवसंजीवनी ठरणार!

औसा : प्रतिनिधी
पावसाळ्यात मांजरा नदीपात्र व परिसरातील पावसाच्या पाण्यामुळे सर्व बॅरेज भरली जातात त्यामुळे मांजरा प्रकल्पाखाली खालील कारसा-पोहरेगाव परिसरातील पावसाचे अतिरिक्त पाणी या नदीच्या पात्रातून कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी नदीच्या पूर्व दिशेला असलेल्या तावरजा प्रकल्पात वळण योजनेतून आणून सोडले तर, लातूर आणि औसा तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारात हरितक्रांती होऊन सिंचनक्षेत्र वाढण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. मांजरा नदीवरील कारसा-पोहरेगाव बॅरेजपासून ही वळण योजना राबविली तर, या पाण्यामुळे तावरजा प्रकल्पाला एक नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे ‘मांजरा’तून वाहून जाणारे पाणी तावरजा मध्यम प्रकल्पात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश (दि.२१) जूनच्या बैठकीत जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपककुमार यांना दिले आहेत.
औसा विधानसभा मतदारसंघातील तावरजा मध्यम प्रकल्पाचे काम जून १९८१ मध्ये पूर्ण झाले. प्रकल्पीय संकल्पित पाणीसाठा २७.७२७ दलघमी असून, प्रकल्प आतापर्यंत १०० टक्के क्षमतेने ३ वेळा, ९० टक्केपेक्षा जास्त ६ वेळा, ५० टक्केपेक्षा जास्त ११ वेळा, ५० टक्केपेक्षा कमी २० वेळा भरलेला आहे. या प्रकल्पातून अनेक पाणीपुरवठा योजना तसेच साखर कारखाने व सिंचन क्षेत्र अवलंबून आहेत.  प्रकल्पात वर्षनिहाय झालेल्या पाणीसाठ्याच्या अभ्यास केला असता प्रकल्प पूर्ण झाल्यापासून ४० वर्षात पाणीसाठ्याची वार्षिक सरासरी ५० टक्के इतकी आहे. म्हणजेच प्रकल्पीय पाणीसाठ्यात ५० टक्के इतकी तूट आहे. तावरजा प्रकल्पात दरवर्षी अत्यल्प पाणीसाठा जमा होतो. १९८१ पासून हा प्रकल्प ३ वेळाच शंभर टक्के भरलेला आहे.
सदरील प्रकल्प सरासरी ५० टक्के पेक्षा कमी भरत असल्याने ऐन उन्हाळ्यात हा प्रकल्प कोरडाठक पडतो. या प्रकल्पातून अनेक पाणीपुरवठा योजना तसेच साखर कारखाने व सिंचन क्षेत्र अवलंबून आहेत. तावरजा नदी प्रकल्पात ही तूट भरुन काढाण्यासाठी आणि लातूर तालुक्यातील पश्चिम भागातील आणि औसा तालुक्यातील पूर्व भागातील पाणीसंकट कायमचे दूर करण्यासाठी मांजरा नदीवरील कारसा-पोहरेगाव बंधा-यातून वाहून जाणा-या अतिरिक्त पाण्यातून वळण योजना अत्यंत महत्वाची ठरणार असून, या भागाचा कायापालट होऊन हरितक्रांती निर्माण होईल. मांजरा नदीवर कारसा-पोहरेगाव येथे बॅरेज बांधण्यात आला असून या बॅरेजमधून मांजरा नदीच्या पुराचे व मांजरा धरणातून सोडलेले पाणी कर्नाटक राज्यात वाहून जाते.  या पाण्याचा सीमावर्ती भागातील प्रकल्पांना फायदा होत नाही. कारसा – पोहरेगाव ते तावरजा मध्यम प्रकल्पामधील अंतर २२ किमी असून स्थिरशिर्ष ३५ मी. आहे. यासाठी ऊर्णामी नलिका लांबी १२ किमी असून गुरुत्वीय नलिका लांबी १० किमी आहे.
कारसा- पोहरेगाव बंधा-याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणारी जलनिष्पत्ती तावरजा प्रकल्पासाठी वळण योजना राबवून तावरजा प्रकल्पस्थळी मंजूर असूनही वापरात येत नसलेली पाणी वापराची सरासरी १४.० दलघमी तूट भरुन काढता येईल आणि त्यातून प्रकल्पाच्या लाभदारकांना सिंचनाचा लाभ होईल. याची आ. अभिमन्यू पवार यांनी जलसंपदा विभागाकडे मागणी केली असून, कारसा -पोहरेगाव बॅरेज येथून तावरजा मध्यम प्रकल्पासाठी वळण योजनेचा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितास दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR