23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमालवणमधील पुतळा सरकारच्या भ्रष्टाचाराचा नमुना

मालवणमधील पुतळा सरकारच्या भ्रष्टाचाराचा नमुना

शरद पवार यांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मालवणमधील पुतळा सरकारच्या भ्रष्टचाराचा नमुना म्हणत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मालवणमधील शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचा हल्ला शरद पवार यांनी केला.

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वा-यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे, हा जनमानसात समज निर्माण झाला आहे. हा शिवप्रेमी लोकांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले.

कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार
राज्यात, देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा पडला. तो फक्त महाराजांचा पुतळा नव्हता, तर महाराष्ट्राचा धर्म होता. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महाराजांचा अवमान करणा-या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा
शरद पवार तब्येत बरी नसतानाही आले आहेत. वयाचे बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी शाहू महाराज आणि शरद पवार आले आहेत. मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी आम्ही राजकारण करत असल्याचे सांगितले जात आहे. ज्या दिवशी महाराजांचा अपमान झाला, तेव्हाच राज्यातील जनतेने शिवाजी महाराजांची माफी मागितली. आम्ही शिवद्रोही सरकार चुकून निवडून दिलं, खोके सरकार निवडून दिलं याची माफी जनतेने मागितली आहे. आम्ही पुन्हा हे सरकार राज्यात येऊ देणार नाही अशी शपथ जनतेने घेतली आहे.
जे माफीवीर लोक आहेत, मोदी असोत की शिंदे असोत हे केवळ निवडणुकीसाठी माफी मागत आहेत. या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. हा फुले- शाहू-आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. या शिवद्रोही सरकारला ‘चलेजाव’चा नारा देणार आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR