23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरराज्यातील राजकीय गणित बिघडवणार

राज्यातील राजकीय गणित बिघडवणार

औसा :  प्रतिनिधी
शेतकरी शेतमजूर आणि निराधारांना वा-यावर सोडणा-या राजकारण्याचे राज्यात आम्ही गणित बिघडवू, असा इशारा औसा येथे शेतकरी शेतमजूर आणि निराधार यांच्या मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. मशाल मोर्चा औशाच्या ऐतिहासिक किल्ला मैदानापासून तहसील कार्यालयावर पोहचल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
तुपकर म्हणाले की, आज शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. शेतमजूरला काम नाही त्यामुळे हातात दाम नाही, निराधार लाभार्थ्यांना वाढत्या महागाई प्रमाणे मानधनात वाढ नाही. सरकारने आमच्या जगण्याचा हक्कच हिरावून घेतला की काय अशी अवस्था झाली आहे. राजकारण्याच्या फोडाफोडीचा धंदा झाला असताना कांद्याच्या झालेल्या वांद्याकडे बघायला सरकारला अजिबात वेळ नाही. कापूस पिकांची अवस्था बिकट झाली आहे. सोयाबीन हे नगदी प्रमुख पीक आहे.  त्याचा भाव पाहता काळ्या  आईची ओटी भरताना केलेल्या खर्चाच्या निम्माही पैसा मिळत नाही. मग जगावं की मरावं हा प्रश्न पडलेला आहे,
यावेळी मोर्चाचे संयोजक राजीव कसबे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतगायत शेतकरी शेतमजूर आणि श्रमिक यांचा दबावगट तयार होऊ दिला नाही. त्यामुळे आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राजकारण फिरत राहिले आहे. त्यास येणा-या काळात उत्तर देऊ असे ते म्हणाले. मशाल मोर्चा औशाच्या ऐतिहासिक किल्ला मैदानापासून तहसील कार्यालयावर पोहचला.  यावेळी सरकार वर टीका करताना शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी सत्ताधारी व विरोधक एकाच नाण्याच्या बाजू असून ते शेतकरी आणि मजुरांची आणि निराधारांची फसवणूक करतात. हा कुटील डाव आम्ही हणून पाडू असे मत व्यक्त केले.
यावेळी सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, सिद्धजी जगताप, श्रीराम चलवाड, मोहिनी कांबळे, सुमनताई, सुरेखा आयवळे, मीनाक्षी डोंगरे, बालाजी गवारे, रुपेश शेंके, खंडू नेटके, रानबा शाहीर, रामगीर महाराज, सोपान डोलारे, राजकुमार पाटील, हणमंत फडणीस, बेबीताई कांबळे, नागनाथ सातपुते, भरत पाटील, अंकुश कांबळे, अस्लम पठाण, ंिलबराज जाधव, नारायण माळी, सुधाकर माळी, गणेश जाधव, सुरेश सूर्यवंशी, मुस्तफा देशमुख, दत्तू बनसोडे, अनिल बनसोडे, महेश, गजानन कल्लूरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निराधारांना मासिक ३००० रुपये मानधन वाढविण्यात यावा, सोयाबीनला १०,००० रूपयांचा भाव देण्यात यावा,, गतवर्षीचा पीकविमा देण्यात यावा, शेतीकर्ज पूर्ण मुक्त करण्यात यावे, याशिवाय काही प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात शेतकरी शेतमजूर, निराधार दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR