मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व लाडक्या बहिणी सरकारच्या पाठिशी आहेत. परंतु विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेला हात लावला तर याद राखा, त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे.
आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशी तुफान फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बुधवारी महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महायुतीचे इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, रिपोर्ट कार्ड देण्यासाठी धाडस लागते. काम करावे लागते. आम्ही प्रचंड कामे केली आहेत. दोन, अडीच वर्षांत तब्बल ९०० निर्णय घेतले आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर मग होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी…असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. पण या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण आहे? मराठवाड्यात मराठा समाजाला प्रथमच कुणबी प्रमाणपत्रं मिळाली. त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन केले. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण यांनी घालवले.
मनोज जरांगे पाटील यांनी ओळखायला हवे की मराठा समाजाला फसवणारे कोण आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. जागा वाटपाची चर्चा योग्य दिशेने सुरू आहे. ते लवकरच जाहीर करणार आहे. आमचा मुख्यमंत्रिपदाबाबत काहीच घोळ नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यांच्यात घोळ सुरू आहे. आता त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा ठरवावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘शासन आपल्या दारी’ योजनेतून पाच कोटी लोकांना लाभ मिळाला आहे. महायुती सरकारने दोन-अडीच वर्षांत जी कामे केली आहेत, ती समोर ठेवली आहेत. दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याच्या योजना आम्ही आणल्या आहेत. १४५ सिंचन योजना आम्ही आणल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले