23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरसोयाबीन अनुदानाची प्रतिक्षा कायम

सोयाबीन अनुदानाची प्रतिक्षा कायम

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
मागच्या वर्षातील २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादनात कमी पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी घट झाल्यामुळे या शेतक-यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. यातील पात्र शेतक-यांच्या खात्यावर अनुदान रक्कम वर्ग करण्यात आले. मात्र यात सामाईक क्षेत्रांसह इतर अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिल्याने ते सोयाबीन अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.

राज्य सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यात प्रत्येक शेतक-याला दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले. मात्र यात अनेकांचे अनुदान जमा झाले नसल्याने पात्र शेतक-यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान तालुक्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या २१ हजार २०१ खातेधारकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर त्यातील १९ हजार ५ शेतक-यांचा डाटा संकलित झाला असून १८ हजार ८६ शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहेत. तर त्यातील २ हजार १९६ शेतक-यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झाले नाही. तर ई-केवायसी किंवा आधार लिंक न केल्यामुळे व सामाईक क्षेत्राचे संमतीपत्र न दिल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

ज्या शेतक-यांनी ई-केवायसी केली आहे. अशा शेतक-यांच्या खात्यावर अनुदान पडले आहे. पण जे शेतकरी पात्र असूनही त्यांना अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत अशा शेतक-यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारण अशा शेतक-यांच्या आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR