सांगली : प्रतिनिधी
लाडक्या बहिणीला आणि शेतक-याला फसवून राज्य सरकार सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींना मानधन देता येणार नाही. तर शेतक-यांची कर्जमाफी नाकारण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ आज गुढीपाडव्यानिमित्ताने सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला आहे. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये लाभ आणि शेतक-यांना कर्जमाफी देणार; असे म्हणून सत्ता स्थापन केली. मात्र लाडक्या बहिणी व शेतक-यांना फसवून सरकार सत्तेवर आले आहे. आता या सरकारने लाडक्या बहिणींना मानधन देता येणार नाही. तसेच शेतक-यांना कर्जमाफी देता येणार नाही, असे जाहीर केले आहे. यामुळे शेतक-यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा
शेतक-यांना कर्जमाफी न देण्याचे जाहीर केल्यानंतर याचा निषेध सर्व राज्यभरातून स्वाभिमानी शेतकरी संघटना करत आहे. दरम्यान आज सांगलीमध्ये काळी गुढी उभा करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यापुढेही तीव्र असे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरकारला देण्यात आला.
राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
राज्य सरकारचा निषेध करत आंदोलना दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भरत चौगुले, संजय बेले, संदीप राजोबा आदीसह अन्य शेतकरी उपस्थित होते.