28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रहुकुमशाहीचा व्हायरस गाडणार

हुकुमशाहीचा व्हायरस गाडणार

४ जूनला देश मोदीमुक्त होणार, आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार
मुंबई : प्रतिनिधी
भाडोत्री लोकांची फौज घेऊन नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना संपवायला आले आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न कराच, हा महाष्ट्र तुमचे राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देताना हुकुमशाहीचा व्हायरस गाडून येत्या ४ जूनला हा देश मोदी मुक्त होईल, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बांद्रा कुर्ला मैदानावर झालेल्या महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेत बोलताना दिला.
हा शाहु, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा शहा, अदानी, मोदींचा महाराष्ट्र आम्ही कधीही होऊ देणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा. एकसुद्धा मर्द मराठा फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईसह महाराष्ट्रातील शेवटच्या १३ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होत असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुंबईतल्या बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवारांसह उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाजी पार्क मैदानावर आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले आहेत. चार जूननंतर ते पंतप्रधान असणार नाहीत. हे त्यांचे मुंबईतले पंतप्रधान म्हणून शेवटचे भाषण ठरेल. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी केली, डिमॉनिटाजेशन केले. तसेच चार जूनला संपूर्ण देश डीमोदीनेशन करणार आहे. नोटबंदी नंतर चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसेच चार जूननंतर हे फक्त नरेंद्र मोदी राहतील, देशाचे पंतप्रधान नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
एकीकडे आपल्या विजयाची नांदी ठरणारी विराट जनसभा आहे तर दुस-या बाजूला सर्व गद्दार आणि भाडोत्री जमले आहेत. त्यांच्याकड सर्व भाडोत्री माणसे आहेत, वक्ते भाडोत्री, उमेदवारी भाडोत्री आणि माणसेही भाड्याने आणलीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. चीनने भारतात घुसखोरी केलीय. पण तिकडे ना मोदी जायला तयार आहेत, ना अमित शाह. सगळं सोडून भाडोत्रींची फौज घेऊन मोदी मुंबईत उद्धव ठाकरेंना संपवायला आले आहेत, संपवून बघा, तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करा, हा महाष्ट्र तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तुम्ही कितीही प्रयत्न करा. माझा मर्द मराठा एकसुद्धा फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदींनी माझ्या घराणेशाहीचा मुद्दा काढला. तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला नकली ठरवताय. मोदीजी कोणत्या घराण्याचे आहेत माहित नाही, कोणाचे संस्कार आहेत माहित नाही, माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीत औरंगजेब जन्माला आला होता, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

हुकूमशहाला गाडून टाका !
कोरोनाकाळामध्ये मी जे जे बोललो ते तुम्ही ऐकलं कोरोना व्हायरसपासून म्हणूनच आपण वाचलो. तसंच आता या हुकूमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी ंिहमत करून फक्त एका बोटाने या हुकूमशहाला गाडून टाका, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली. यांचा महाराष्ट्रावरचा आकस पदोपदी दिसतो. महाराष्ट्राची राजधानी तुम्ही भिकारी करायला निघाला आहात. महाराष्ट्रातले उद्योगधंदे तुम्ही गुजरातला पळवून नेले. इकडे आम्ही मराठी गुजराती हिंदी सगळे एकत्र राहतोय मुसलमानही राहताहेत. त्यात मिठाचा खडा टाकू नका, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR