लातूर : प्रतिनिधी
असाक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमातंर्गत जिल्हयात रविवारी १ हजार ५७४ केंद्रावर १५ वर्षा पुढील १४ हजार ४०९ असाक्षरांनी नवसाक्षरतेसाठी परीक्षा दिली. यात परीक्षा देणा-यांमध्येही पुरूषांच्यापेक्षा स्त्रीयांची संख्याही सर्वाधिक दिसून आली.
केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अनुषंगाने २०२२ ते २०२७ या कालावधीमध्ये देशभरातील सर्व अक्षरांना साक्षर करण्याचे अभियान राबवले जात आहे. १५ वर्ष वयाच्या पुढील सर्व असाक्षरांना नवसाक्षर करणारी ही योजना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील उल्लास अॅपवर नोंदणी केलेल्या १५ हजार ४०९ असाक्षरांना साक्षर होण्याच्या संधीसाठी पात्र ठरले. यात १० हजार २२३ महिला, ५ हजार १८० पुरूषांचा समावेश होता.
जिल्हाभरामध्ये १ हजार ५७४ परीक्षा केंद्रावर रविवारी १४ हजार ५५६ असक्षरांची परीक्षा सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडली. यात ९ हजार ६१३ स्त्रीया तर ४ हजार ९४३ पुरूषांची उपस्थिती होती. तसेच यामध्ये अनुसुचित जातीचे ३ हजार ६८७, अनुसूचित जमातीचे ७४६, अल्पसंख्याक १ हजार ५८३, इतर ८ हजार ५४०, तर ४८ दिव्यांगानी नवसाक्षरतेसाठी परीक्षा दिली.