लातूर : प्रतिनिधी
शिक्षणाची पंढरी, अशी ओळख असलेल्या लातूर शहरात कचरा जाळण्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. शहरात ज्या ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे त्या ठिकाणी कचरात पेटवण्यात येत आहे. बहुदा हा कचरा मुद्दामहून पेटवून कच-याचा साठा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्या ठिकाणाहून कचरा उचलून नेण्याचे प्रमाण कमी व्हावं याकरिता कचरा पेटवला जात आहे, अशी शंका यायला लागलेली आहे. विशेष म्हणजे दि. १८ मार्च रोजी शहरात अनेक ठिकाणी कचरा पेटवून देण्यात आला. सुमारे ३० ट्रॅक्टर कचरा जाळला गेला. सकाळी ६ ते १० ही वेळ लातूर शहरच स्मशान झाल्यासारखी होती. कचरा धगधगत होता. धुराचे लोळ उठले होते. त्यामुळे वायु प्रदुषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली.
शहरातील घन कचरा व्यवस्थापनाचे काम ‘जनाधार’ या स्वयंसेवी संघटनेस लातूर शहर महानगरपालिके ने दिलेले आहे. प्रारंभीच्या काळात या संस्थेने घन कचरा व्यवस्थापनाचे काम ब-यापैकी केले. परंतु, सद्य:स्थितीत ही संस्था या कामात कमालीची निष्क्रीय झाली आहे. कचरा उचलण्यापेक्षा तो जागेवरच जाळून नष्ट करण्याकडे कल वाढला वाढला आहे. यात संबंधीत संस्थेच्या कर्मचा-यांसह नागरिकांचाही सहभाग वाढल्याने कचरा जाळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कचरा संकलनाचे काम हलके करण्यासाठी मुद्दाम कचरा पेटवला जात आहे. सोमवारी तर लातूर शहरात सर्वत्र कचरा पेटवून देण्यात आला होता. विशेषत: पीव्हीआर चौक ते औसा रिंगरोडच्या दोन्ही बाजूला कचरा धगधगत होता. जणु लातूर स्मशान झाल्यासारखी परिस्थिती होती.
शहरातहल कोणत्याही रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी कच-याचे ढीग पडलेले आहेत. त्याठिकाणी रात्रीच्या वेळेस कचरा पेटवून देण्याचे प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहेत. कचरा उचलून नेताना जो त्रास आहे तो कचरा पेटवून दिल्यामुळे कमी होतो, कष्ट वाचतात, मेहनत वाचते पण मनुष्याचे, मानवाच्या आरोग्याला या पेटलेल्या कच-यातून कच-याद्वारे जे काही नुकसान होत आहे, पर्यावरणाला प्रदूषणाला जे काही नुकसान होत आहे याकडे मात्र सगळ्यांनीच डोळझाक केलेली दिसून येत आहे.