परभणी : परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतूर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अडकलेली क्रुझर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर येथील ब्राह्मणवाडीचे एकूण ९ जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर परत जात असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दर्शनाहून निघाले होते परत…
जालना जिल्ह्यातील परतूर येथील ब्राह्मणवाडीचे काही भाविक परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दर्शन झाल्यावर हे भाविक पुन्हा जालना जिल्ह्याकडे परत निघाले होते. दरम्यान, रात्रीचा प्रवास सुरू असतानाच भाविकांच्या क्रुझर आणि ऊस घेऊन जाणा-या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. ज्यात, एकूण ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, इतर ६ भाविक देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.