23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंची आमरण उपोषणाची वेळ सरकारला अडचणीची

जरांगेंची आमरण उपोषणाची वेळ सरकारला अडचणीची

२१ जानेवारीला मुंबई मॅरेथॉन तर २२ जानेवारीला राम मंदिर सोहळा

मुंबई : मनोज जरांगे २० जानेवारीपासून मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. बीडमधल्या सभेतून जरांगे पाटलांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान मनोज जरांगेंनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला नाही तर भाजप आणि टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
एकीकडे २२ जानेवारीला राम मंदिराचा सोहळा आणि दुसरीकडे जरांगेंचे आमरण उपोषण सरकारला डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पावले उचलेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तर टाटा मॅरेथॉनची सांगता २१ जानेवारीला आझाद मैदानात होणार आहे.

त्यामुळे जरांगेंचे आमरण उपोषण टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी अडचणीचे ठरण्याची दाट शक्यता आहे.
बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. स्वत: अंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा, असे आवाहन त्यांनी महिलांना केले. सरकारने दहा-बारा दिवस मिळत आहेत ते बघावेत. एकदा अंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मुंबईत २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण
मराठा आरक्षणासाठी लढणा-या आंदोलकांना पोलिसांनी १८ जानेवारीपर्यंत नोटीस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं. आता मुंबईत २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR