जयपूर : बहुप्रतिक्षित राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला. भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात २२ आमदारांनी मंत्री म्हणून आज शपथ घेतली. १५ डिसेंबर रोजी भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री म्हणून तर दीयाकुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर राजस्थानच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा केली जात होती.
राजभवन येथे शनिवारी आयोजित सोहळ्यात राज्यपाल कलराज मिश्र यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. बावीस मंत्र्यांत १२ कॅबिनेट आणि पाच जणांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पाच जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळात किरोडीलाल मीना, मदन दिलावर, राज्यवर्धन सिंह राठोड, गजेंद्र सिंह खिंवसर, बाबूलाल खराडी, जोगाराम पटेल, सुरेश सिंह रावत, अविनाश गेहलोत, जोराराम कुमावत, हेमंत मीना, कन्हैयालाल चौधरी, सुमीत गोदारा यांना कॅबिनेट मंत्री केले आहे.
त्याचवेळी श्रीकरणपूरचे भाजपचे उमेदवार सुरेंद्रलाल टीटी हे आमदार होण्यापूर्वीच मंत्री झाले आहेत. तसेच ओटाराम देवासी, मंजू बाघमार, विजय सिंह चौधरी, केके विश्नोई, जवाहर सिंह बेढम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. संजय शर्मा, गौतम कुमार, झाबर सिंह खुर्रा, सुरेंद्र पाल सिंह आणि हीरालाल नागर यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली आहे.