पुणे : परदेशातून येताच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही ज्या लोकांवर आरोप केले, ज्यांचे घोटाळे बाहेर काढले. ते लोक भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या घोटाळ्याचं काय झालं? आमच्या कंपन्यांवर ईडीची धाड पडली. अशा धाडींमुळे मी घाबरणार नाही, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस हे पुणे शहरात असताना दिवसाढवळ्या गँगवार होतो. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या सहा कार्यालयावर काल ईडीने छापेमारी केली. सात ते आठ तास ही छापेमारी सुरू होती. रोहित पवार हे परदेशात असतानाच ही छापेमारी झाली. या छापेमारीवर रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
मी चुकीचे केले असते तर मी काल संध्याकाळी परदेशातून आलो नसतो. अजून १० ते १५ दिवस बाहेर राहिलो असतो. या आधी ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई झाली ते एक तर दिल्लीला गेले.किंवा सत्ता बदल झाल्याचे तरी आपण पाहिले आहे. मी अजिबाबत घाबरलो नाही. मी सिंपथीही घेत नाही. लोकांना कारवाई का केली? कशी केली माहीत आहे. अधिका-यांचे काहीही चुकले नाही. त्यांना जे सांगितले जाते तेच ते करतात. ते येतात, कागदपत्रे तपासतात आणि जातात, असे रोहित पवार म्हणाले.
ज्या गोष्टी मला माहीत नाही, त्याची मला मीडियातून माहिती मिळते. कागदपत्र जप्त झाल्याची बातमी मीडियातूनच कळली. गुप्त कागदपत्र हा ईडी आणि आमच्यातील विषय होता तो मीडियाला कसा कळला? याचे आश्चर्य आहे.
फडणवीस यांना एवढेच सांगायचे आहे. तुम्ही ज्या शहरात ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड उघड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहे. आज सर्वात खराब पोलिस व्यवस्था ही महाराष्ट्रात आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यावर कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावे आणि फक्त गृहमंत्रीपद पाहावे आणि तिथे तरी न्याय द्यावा. म्हणजे गरिबांना न्याय मिळेल. जर होम मिनिस्टर म्हणून त्यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा.
त्या आरोपांचे काय झाले?
भाजपचे सरकार आले तेव्हा सर्वच कारवाया आमच्यावर झाल्या. जे कागदपत्र लागतात ते सर्व आम्ही त्यांना दिले. माझा विषय मोठा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मला एवढेच सांगायचे, तुमच्याकडे येण्यापूर्वी तुम्ही ज्या नेत्यांवर आरोप केले, ज्यांच्यावर कारवाई सुरू होती, त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.