नवी दिल्ली : भारतातील कृषी निर्यात क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. सध्या देशाने कृषी निर्यातीने अंदाजे ५० अब्ज डॉलर्सचा आकडा ओलांडला आहे. आता २०३० पर्यंत देशातून कृषी निर्यात दुप्पट होईल आणि ती १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी सांगितले की, देशातून कृषी उत्पादने आणि सेवांची निर्यात वेगाने वाढत आहे. २०३० पर्यंत देशातून वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचे उद्दीष्ट २ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कृषी निर्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फूड अँड बेव्हरेज शो इंडस फूड २०२४ मध्ये सुनील बर्थवाल यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते म्हणाले की, भारतातील रेडी टू फूड सेगमेंटमध्ये प्रगतीला मोठा वाव आहे. भारतीय उत्पादने आणि सेवा हव्या असलेल्या देशांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्यांनी काम करावे.