हैदराबाद येथील पहिल्या कसोटीतील तिस-या दिवसाखेर साहेबांनी यजमानांवर समाधानापुरती नॉमिनल आघाडी घेतली. टीम इंडियाने काल पहिल्या डावात १९० धावांची आघाडी घेतली होती. ती आघाडी संपेपर्यंतच साहेबांचा निम्मा संघ तंबूत परतला. इंग्लिश संघाचे पहिले पाच खेळाडू १६३ धावांवरच बाद झाले. टीम इंडियाचा एकही फलंदाज आपल्या पहिल्या डावात तीन आकडी संख्या गाठू शकला नाही. यशस्वी जयस्वाल (८०), लोकेश राहुल(८६), रवींद्र जडेजा (८७)हे तिघेही नव्वदीत बाद झाले. रविचंद्रन अश्विनच्या धावबादचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या रचली. साहेबांचा दुसरा डावही कोसळेल असे वाटत होते पण मधल्या फळीतील ओली पॉपने नाबाद (१४८)शतक झळकावत साहेबांच्या खात्यात नॉमिनल आघाडी मिळवून मानसिक समाधान दिले.
ओली पॉपला अक्षर पटेलने ११० धावांवर असताना जीवदान दिले. इंग्लिश संघाने १२६ धावा जास्त केल्या. त्यांचे अजून तळातील चार फलंदाज बाद व्हायचे आहेत. ओली पॉप तळातील फलंदाजांना हाताशी धरत आपले द्विशतक करून चांगल्या मजबूत स्थितीत पोहोचवेल का व त्यांना मिळालेल्या आघाडीत त्यांचे तीन फिरकी मंदगती गोलंदाज भारतीय संघाचे दहा खेळाडू बाद करतील का या सर्वांवर क्रिकेट रसिकांचे लक्ष राहील.
या सामन्याच्या स्थितीवरून भारतीय संघ २०१५ मध्ये श्रीलंकेच्या दौ-यावर असताना झालेल्या कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी घेतली होती तरीही टीम इंडिया ६३ धावांनी पराभूत झाली होती. दुस-या डावात रंगना हेरथने सात विकेट घेत भारताचा ११२ धावांत फडशा पाडला होता. टीम इंडियाला विजयासाठी चौथ्या डावात फक्त १७६ धावांचे टार्गेट होते ते पूर्ण करू शकले नव्हते पण या सामन्यावेळी इंडिया पाहुण्या मैदानावर खेळत होती. यावेळी मात्र हैदराबाद स्टेडियमवर आपल्या प्रेक्षकांसमोर असे काही घडणार नाही अशी आशा.
– (डॉ. राजेंद्र भस्मे)