नाशिक : शेतक-यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही. कधी शेतमालास दर मिळाल्यास सरकारकडून निर्यातबंदीची घोषणा केली जाते. यामुळे शेतमालाचे दर बाजारात कोसळतात. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी करण्याचे आदेश ८ डिसेंबर रोजी काढले होते. त्यानंतर कांद्याचे दर चार हजारांवरून आता हजारापर्यंत आले आहेत. कांद्याबाबत घेतलेल्या त्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे द्राक्षाचे भाव कोसळले आहेत.
द्राक्षांवर १०३ रुपये आयात शुल्क
कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने द्राक्षावर अतिरिक्त खर्च काढण्यासाठी शुल्क लावले आहे. बांगलादेशाने आयात होणा-या द्राक्षांवर १०३ रुपये आयात शुल्क लावले आहे. यामुळे भारतीय द्राक्षांचे बाजारभाव कोसळले आहेत. यामुळे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.
निर्यातबंदी हटविण्याची मागणी
निफाड तालुक्यातील नैताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र बोरगुडे यांनी ३० एकरावर द्राक्ष बागेची लागवड केली. एकरी २ लाख रुपये खर्च केला. आता मिळणा-या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी, तसेच बांगलादेशातील आयात शुल्क दर रद्द करण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे.